Saturday, August 27, 2011

ऋणानुबंध

माणसाचे आयुष्य म्हणजे अनेक नात्यांची गुंफण! प्रत्येक नात्याचे कर्तव्य वेगळे आणि अधिकारही वेगळे!
त्यातली काही नाती नाजूक व हवीहवीशी वाटणारी! तर काही नाती कर्तव्य म्हणून पार पाडली जाणारी. या नात्यांमध्ये माणसाचं जीवन विभागलेलं! पण रक्ताच्या सर्व नात्यांइतकच जवळचं वाटणारं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचं स्थान असणारं नातं म्हणजे मैत्रीचं..!

खरंच मैत्रीचा उदय म्हणजे एक नित्य नवा अनुभव आहे. हृदयाच्या मंदिरात, भावनेच्या जलावर, प्रेमाच्या वेलीवर सदैव फुलणारे फुल म्हणजे मैत्री होय. किती सहज आणि सोप्या शब्दात मैत्रीचा खरा अर्थ आपणास अनुभवास मिळतो. आपण मैत्री करतो, पण ती कुठपर्यंत निभावतो; कारण नुसतं मैत्री करून चालत नाही, तर त्या मैत्रीत असणारी निरागसता जपावी लागते. मैत्री हे एक फुल आहे. त्या फुलाच्या पाकळ्या जितक्या फुलवाव्या तितक्या फुलतात; पण त्या फुलाच्या पाकळ्या पडू न देणं हे खऱ्या मैत्रीचं लक्षण आहे.

मैत्री ही कशी, कोणाशी होईल ते सांगता येत नाही. मैत्री ही निरागस, निस्वार्थी असावी. तिला स्वार्थ या शब्दाची सांगड नसावी. नाही तर ती जितक्या लवकर जुळते, तितक्या लवकर तुटते सुद्धा. अंधाराच्या उगमासाठी प्रकाशाची पूजा करावी लागते. तसेच मैत्रीत भावनेची पूजा करावी लागते. मैत्रीत जे सर्व देता येईल ते द्यावं आणि जे घेता येईल ते घ्यावं. मैत्रीत सर्व काही दिले तरी सर्व काही आपल्याजवळ उरते. कारण मैत्रीत फक्त देहात फरक असतो. मनात फरक नसतो. आपल्या मैत्रीत विश्वास असावा आणि तोही दगडांमधून वाहणाऱ्या, खळखळणाऱ्या झऱ्यासारखा.

एकमेकांवर असलेली मायेची खात्री म्हणजे आपली खरी मैत्री.. मैत्रीत वादविवाद असावेत. पण गैरसमज नसावेत. वादविवादाने मैत्रीत एक प्रकारची ओढ निर्माण होते आणि मैत्री आणखीनच घट्ट होण्यास मदत होते. मैत्रीत भावनांची कदर करावी. उणे-दुणे, राग, तिरस्कार सारख्या शब्दांना मैत्रीत थारा नसावा.

दुःखात मनात सावरणारं आणि सुखात सहभागी होणारं, अडचणींमध्ये दिशादर्शन करणारं, तर आवेगाला वेळीच भान आणून देणारं मैत्र आपल्याला अपेक्षित असतं. या सगळ्याच बाबी एकाच व्यक्तीमध्ये पूर्णांशाने असतात, असं नाही; तरीही त्यातल्या अन्य बाबी एका सुहृद मनाला कुठेतरी त्या मैत्रीशी बांधून ठेवीत असतात.

अशी ही मनाच्या कप्प्यात जपून ठेवावी अशी मैत्री. शब्दशब्दाने, स्नेहाच्या भावनेने फुललेली, मोहरलेली, निखळ आनंदाचा झरा असलेली मैत्री चिरंतन बहरत राहावी..

शिंग फुटले का?

आपण शाळेतल्या त्या बंदिस्त वातावरणातून कॉलेज नावाच्या स्वतंत्र आणि मोकाट नवविश्वात पदार्पण करण्या अगोदर अथवा नंतर आपल्या वागण्यात जे अमुलाग्र बदल होतात याला आपले पालक किंवा ज्यांनी कॉलेजचे तोंड कधी पाहिले नाही असे लोकं "शिंग फुटणे" म्हणतात.

आता हे अमुलाग्र बदल कोणते की ज्यामुळे आपल्याला "शिंग फुटले" हे उठता बसता ऐकावे लागते, तर एखादा शेंबडा, शेळपट, गचाळ, शाळेचा गणवेश ही धड न घालणारा मुलगा कॉलेजला मात्र अगदी शिनेमातल्या हिरो प्रमाणे राहायला लागतो. सोल्जर कट (एकदम बारीक केस) हा स्पाय कट किंवा जॉन सारख्या हिप्पी कट मध्ये परावर्तीत होतो, एखादा जन (पूर्वीच्या) अजय देवगण सारखा शायनिंग, तोंडाने वर फुक मारत केसांचा पल्ला उडवत चालतो, शाळेत कधीही वेळेवर न येणारा मुलगा कॉलेजला मात्र एखाद तास अगोदरच येऊन बसतो (अर्थात हिरवळ पाहायला), शाळेत पूर्वसूचना देऊन रजा राहणारा मुलगा खुशाल बंक मारून पार्किंग अथवा कट्ट्यावर टवाळक्या करतो आणि त्याची कारण पण लई इन्टरेष्टिंग असतात. कुणी म्हणत आज जाम कंटाळा आलाय, कुणी म्हणत घरी जायचंय, कुणी म्हणत भेटायला जायचंय ( कुणाला ते...... हा कॉमनसेन्सचा भाग झाला) आणि मग शाळेच्या टायमाला मनातच दडून बसलेले क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल वरचे प्रेम एकदम उफाळून येते.

शाळेत तासाला कधीही चॉकलेट न खाणारा कॉलेज मध्ये लेक्चरला पाच्याक पाच्याक च्युइंगम चावत असतो, शाळेत नेहमी डब्बा नेणाऱ्या मुलाला क्यानटीन मधले पंच-पक्वान्न (मिसळ, पाव, कांदा, लिंबू, पापड) इतकी आवडायला लागतात की रीसेस ची वाट न पाहताच भूक शमवायची गरज भासते ( अर्थात ती भूक कॉलेज संपेपर्यंत नाही शमत)

कॉलेजच्या काळात कट्टा म्हणजे मुलाला आपल्या "जान" पेक्षा प्राणप्रिय असतो (ही "जान" कट्ट्यानेच दिलेली असते........ एक सोडून गेली तरी दुसरीची सोय इथूनच करणार) . कट्ट्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आलेल्या गेलेल्या पोरा-पोरींवर लक्ष ठेवता येत. मोठ्या मेहनतीने पैसे जमा करून शिनेमा पाहायला जातात ( काही वेळेस 'आमसुली' शिनेमे बघण्याची तीव्र कळ पण कट्ट्यावरच येते )

याच कट्ट्यावर यक से यक गवय्ये होतात. कधी बाथरूम मध्ये न गाणारा मुलगा बी पोरगी दिसल्यावर वरच्या पट्टीत रियाज सुरु करतो आणि पोरीने मागे वळून पाहिले तर ( खुन्नस ने) 'तो मी नव्हेच' अश्या अविर्भावात सात्विक भाव चेहेऱ्यावर आणून सोज्वळ मुलाप्रमाणे वर्तन करतो ( प्रेमात बघितले तर इचारायलाच नको पोरगा जमिनीपासून ७-८ फुट वर) म्हणजे अभिनय शिकण्याचे वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत.

कधीही स्वतः कडे न बघणारी (शाळेत असताना) पोट्टी जाता-येता आरश्यात बघण्यात, मखडन्यातच व्यग्र दिसते (कट्ट्यावर बसणारी पोरे आपल्यालाच बघून नाय ना हसत? असं बघत असतात). कॉलेज मध्ये आल्यावर जिम, हेल्थ क्लब लावण्याची फ्याशन जोर धरते ( पोरींचा काही दुसरा हेतू असेल तर विचारू नका)

आपले संपूर्ण आयुष्य कॉलेजच्या पाच वर्षातच जगण्याचे, थोडक्यात एन्जॉय करण्याचे जे खट्याळ प्रयत्न केले जातात त्यालाच शिक्षक, पोर-पोरी, पालक लोकं "शिंग फुटली का?" असे संबोधतात.